मुस्लिम उमेदवार व मतदारांना घालण्यासाठी गळ,खा. अशोक चव्हाण यांनी भोकर मध्ये मध्यरात्रीपर्यंत ठोकला तळ
भाजपा व खा.अशोक चव्हाण यांचा सुक्ष्म रणनितीतून मुस्लिम मतदारांना भाजपाकडे वळविण्याचा प्रयत्न...

उत्तम बाबळे,संपादक
भोकर : स्थानिक स्वराज्य संस्थांतील होऊ घातलेल्या नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतून नगराध्यक्ष,नगरसेवकांचे संख्याबळ वाढविण्यासह भाजपाच्या मतदारांची टक्केवारी ही वाढविण्यासाठी उद्देशाने दि.८ नोव्हेंबर रोजी “मुस्लिम उमेदवार आणि मतदारांना घालण्यासाठी गळ,माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी भोकर मध्ये रात्रीला ठोकला होता तळ”.यातून भाजपा व खा.अशोक चव्हाण यांचा सुक्ष्म रणनितीतून मुस्लिम मतदारांना भाजपाकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु झाला असल्याची चर्चा होत आहे. 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक -२०२५ मध्ये नांदेड जिल्ह्यातील भाजपाचे सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्याची मुख्य जबाबदारी माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्यावर पक्षश्रेष्ठीने सोपविली आहे.राज्यस्तरीय नेत्यास एका जिल्ह्यापुरते सिमित केले असल्याची उपरोधात्मक टिका टिप्पणी विरोधी पक्षांसह अनेकांतून होत असली तरी मॅनेजमेंट गुरु म्हणून खा.अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते.त्याचा प्रत्यय दि.८ नोव्हेंबर २०२५ रोजी भोकर मध्ये दिसून आला आहे.जसे की,मुस्लिम वोट बँक ही भाजपाची नाही तर सेक्युलर पक्षाची आहे असे बोलल्या जाते. यदाकदाचित तसे असू ही शकते,त्यामुळेच भाजपा पक्षाकडून बहुतांश मुस्लिम उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी अनुकूल नसतात.त्यामुळे त्यांना भाजपा ची उमेदवारी देण्यासाठी व मुस्लिम मतदारांना भाजपाकडे वळविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे,असे मत खा.अशोक चव्हाण यांचे आहे.यामुळेच त्यांनी भोकर मध्ये मुस्लिम उमेदवार व मतदारांना गळ घालण्यासाठी मध्यरात्री पर्यंत तळ ठोकला होता.त्यांनी प्रभाग क्रमांक ६ मधील इच्छुक उमेदवार माजी उपनगराध्यक्षांचे सुपूत्र सना इनामदार, किनवट रस्त्यावरील दारुल उलूम मदरसा व मस्जिदचे अध्यक्ष हाजी माजिद लाला आणि माजी उपनगराध्यक्षांचे प्रतिनिधी शेख युसूफ भाई यांच्याकडे भेटी दिल्या.
यावेळी इच्छूक मुस्लिम उमेदवार व मतदारांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले.तसेच त्यांचे मन व मत भाजपाकडे वळविण्यासाठी आश्वासक भुमिका मांडली.यास काहींनी प्रतिसाद दिला.तर सन २०१५ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या माजी उपनगराध्यक्षांचे प्रतिनिधी शेख युसूफ यांच्या समर्थकांनी खा.अशोक चव्हाण यांच्याकडे शेख युसूफ हे अपक्ष उभे राहतील व त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून आपण मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.यास उत्तर देतांना खा.अशोक चव्हाण यांनी म्हटले की,मला तसे करता येत नाही,त्यांनी भाजपाकडून पक्ष चिन्हावर निवडणूक लढावी त्यांना विजयी करण्यासाठी माझी पुर्ण शक्ती त्यांच्या पाठीशी राहील.आणि यात काही दगा फटाका झाला तरी त्यांना सभागृहात नेण्याची ग्वाही मी देतो.तर शेख युसूफ हे अपक्ष उभे राहणार का भाजपाकडून? याविषयी त्यांनी यावेळी स्पष्ट भूमिका मांडली नसली तरी मतदारांसोबत चर्चा करून ते दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याची चर्चा होत आहे.
मुस्लिम मतदार जर भाजपा विरोधी असतील तर खा. अशोक चव्हाण यांनी भोकर मधील मुस्लिम उमेदवार व मतदारांना मध्यरात्री पर्यंत भेटी देण्याची आणि मनधरणी करण्याची काय आवश्यकता होती? दिल्ली पर्यंतच्या नेत्याने गल्लीत का फिरावे ? अशी उपरोधात्मक टिका टिप्पणी विरोधी पक्षांसह अनेकांतून केली जात आहे. परंतू टिका टिप्पणी करणाऱ्यांनी ते किती मोठे नेते आहेत व त्यांनी काय केले नाही पाहिजे ? यावर टिका टिप्पणी करण्यापेक्षा भाजपा व खा.अशोक चव्हाण यांच्या जमिन पातळीवरील सुक्ष्म रणनितीचा बोध घेणे गरजेचे आहे. कारण भाजपाच्या चिन्हावर जर मुस्लिम उमेदवार उभे राहिले तर भोकर मधील बहुसंख्य मुस्लिम मतदारांपैकी किमान काही अंशी मतदार नक्कीच भाजपाकडे वळतील ? असा विश्वास त्यांना आहे.नव्हे तर भाजपाच्या मतदानाची टक्केवारी वाढण्यात ही भर पडेल असे ही त्यांना वाटते ? म्हणूनच तर “मुस्लिम उमेदवार व मतदारांना घालण्यासाठी गळ,खा.अशोक चव्हाण यांनी भोकर मध्ये मध्यरात्रीपर्यंत ठोकला होता तळ”.असे बोलल्या जात आहे.



