Wed. Apr 16th, 2025

चार चाकी वाहनाच्या अपघातात ५ जण ठार; १ गंभीर व ४ जण किरकोळ जखमी

Spread the love

रेणापूर ता.भोकर येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

भोकर उमरी रस्त्यावरील मोघाळी तलाव नदीवरील पुलावर झाला हा भिषण अपघात

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथून उमरीकडे जात असलेल्या चार चाकी वाहनाच्या चालकाचा गतीवरील ताबा निसटला व ते वाहन हाळदा-मोघाळी गावाच्या मध्ये असलेल्या शिवारातील तलावाच्या नदीवरील पुलावरुन नदीत पडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेत असतांना दोघींचा मृत्यू झाला आहे.तर एक जण गंभीर व चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

भोकर येथील एका नातेवाईकाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे चार चाकी वाहनाने दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी १० जण परत जात असतांना त्या वाहनाच्या चालकाचा गतीवरील ताबा निसटला व रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान भोकर उमरी रस्त्यावरील हाळदा-मोघाळी ता.भोकर या गावाच्या मधील शिवारात असलेल्या तलावाच्या नदीवरील पुलावरुन ते वाहन नदीत कोसळले.रात्रीची वेळ व नाल्यात पाणी असल्याने त्या वाहनातील प्रवाशांना बाहेर निघण्यास मोठा अडथळा निर्माण झाला.त्यातील काही जणांनी आरडाओरड केल्याने रब्बी पिकांच्या रक्षणासाठी जवळच्या शेतात असलेले मोघाळी व हाळदा येथील काही नागरिक मदतीसाठी धाऊन गेले.तसेच त्यांनी झालेल्या भिषण अपघाताची माहिती भोकर पोलीस ठाण्यात कळवली.ही माहिती मिळताच पो.नि.सुभाषचंद्र मारकड,महिला सहाय्यक पो.नि.कल्पना राठोड,सहा.पो.उप.नि.दिलीप जाधव, सहा.पो.उप.नि.संभाजी देवकांबळे,जमादार रवि मुधोळे,पो.ना. परमेश्वर कळणे,पो.कॉ.लहु राठोड,पो.चालक मंगेश क्षिरसागर व सामाजिक कार्यकर्ते जुनेद पटेल,सुलेमान शेख,शाहरुख खान यांची टीम घटनास्थळी पोहचली व तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने जखमींना त्या वाहनातून बाहेर काढले असता नाका-तोंडात पाणी गेल्याने गुदमरुन यातील सविता श्याम भालेराव (२५),प्रिती परमेश्वर भालेराव (८)दोघी ही रा.रेणापूर ता.भोकर व सुशिल मारोती गायकवाड (९) रा. रामखडक ता.उमरी या तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.तर जखमींना भोकर शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर रेड्डी व त्यांच्या मदतनीस परिचारिकांनी तात्काळ प्रथमोपचार केला.तसेच गंभीर जखमी झालेल्या रेखाबाई परमेश्वर भालेराव(३०),अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव(२८), श्याम तुकाराम भालेराव (३५) तिघे ही रा.रेणापूर ता.भोकर यांना पुढील अधिक उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले.परंतू नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी उपरोक्त दोघींचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.तर जखमी श्याम तुकाराम भालेराव यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरु आहेत.तसेच जखमी दत्ता ज्ञानेश्वर भालेराव (९),प्रितेश परमेश्वर भालेराव (८),सोहम ज्ञानेश्वर भालेराव (७),ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव(२८) सर्वजण रा. रेणापूर ता.भोकर यांच्यावर भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

मयत व जखमी सर्वजण हे एकाच कुटुंबातील असून मयत तिघी या सख्ख्या जावा आहेत.सदरील दुर्दैवी अपघातात एकाच गावातील ५ जणांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने रेणापूर गावावर शोककळा पसरली आहे.उत्तरीय तपासणी नंतर दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी मयत ५ जणांच्या पार्थिवावर रेणापूर ता.भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच पुढील अधिक तपास व कारवाई पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलीस करत आहेत.

शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भाजपा उत्तर नांदेड चे जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख यांनी दिली भेट व जखमींची केली विचारपुस

भाजपाच्या गाव चलो अभियानाच्या अनुषंगाने भाजपा उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख हे भोकर तालुक्यातील पाळज,दिवशी या गावी जात होते.परंतू सदरील भीषण अपघाताची माहिती त्यांना मिळताच तो दौरा रद्द करुन ते व त्यांच्या सोबत असलेले माजी जि.प.सदस्य तथा ओबीसी मोर्चाचे उत्तर नांदेड जिल्हा सरचिटणीस दिवाकर रेड्डी सुरकुंठवार,तेजस मलदोडे यांसह आदीजण शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आले व त्यांनी जखमींची आस्थेवाईकपणे चौकशी केली.तसेच उपस्थित वैद्यकिय अधिकारी डॉ.सागर रेड्डी यांना जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सुचना दिल्या. तसेच दुर्दैवी मयतांच्या कुटूंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !